Sunday, November 19, 2017

प्रकरण ७ वे - निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?

प्रकरण ७ वे 

७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?
कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते.  विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून आपण त्या शेअरच्या किंमतीत होणा-या चढ उतारामुळे आपले मन विचलीत होत नाही व चुकीच्या वेळी शेअर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय आपण घेत नाही. उलट अशा शेअरची किंमत जर कमी झाली तर ती एक चांगली संधी समजून आपण त्या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करतो व तेजीच्या काळात जास्त फायदा मिळवतो. दुसरा फायदा म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक हि दिर्घ मुदतीसाठीच जास्तकरुन फायदेशीर होते हे आपणास कळते व तसे आपण निर्णय घेतो.  

पीएसआर (प्राइज टू सेल्स रेशो): 
हा रेशो ३ पेक्षा कमी असलाच पाहिजे, खरं म्हणजे तो १ पेक्षाही कमी असेल तर चांगले. याच्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत व प्रती शेअर विक्री यांची तुलना करता येते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे कि जर का पीएसआर ३ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान होण्याचीच शक्यता (खात्रीच म्हणाना) जास्त असते व जर हा रेशो १ पेक्षा कमी असेल तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

पीएसआर = शेअरची किंमत / प्रती शेअर मिळणारे मागील १२ महिन्याचे विक्रीचे उत्पन्न
उदा.: क्ष लि. ची गेल्या १२ महिन्यातील एकूण विक्री = रु.१०० कोटी
कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या १ कोटी
म्हणून प्रती शेअर विक्रीचे उत्पन्न रु.१००
कंपनीच्या शेअरचे बाजार मुल्य रु.७५ प्रती शेअर
पीएसआर = ७५/१००
= ०.७५

रिटर्न ऑन इक्वीटी: 
याचा अर्थ तुमच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो, वॉरेन बफेट म्हणतो जर का तुम्हाला २०% च्या दरम्याने मिळत असेल तर तो चांगला समजावा.
Return on Equity = Net Income/Shareholder's Equity

डेब्ट इक्वीटी रेशो: 
हा रेशो कंपनीच्या स्वत:च्या भांडवलाशी कर्जाचे प्रमाण दाखवतो. कंपनीचे एकूण कर्ज / कंपनीचे एकूण शेअर भांडवल या सुत्राने हा काढला जातो. हा किमान ०.५ पेक्षा तरी कमी असणे उत्तम, परंतु १ असला तरी चालू शकते. मात्र जर का तो २ पेक्षा जास्त असेल तर धोक्याची घंटा समजावी. याचा अर्थ कंपनीला जास्त प्रमाणात कर्जावर व्याज द्यावे लागेल व त्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफा मिळवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल. म्हणून सगळेच कर्ज वाइट असते असे नव्हे जर का कर्जावरील व्याजाची फेड करुनही जर का कंपनीचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असेल तर कंपनी कर्जाचा उपयोग विस्तारीकरणावर किंवा उलाढाल वाढीसाठी प्रभावीपणे करत आहे असे समजले जाते. मात्र पायाभूत सुवीधा पुरवणा-या कंपन्यांचे बाबत हा रेशो वापरणे योग्य नसते कारण त्यांची उभारणीच मुळी उच्च डेब्ट इक्वीटी रेशोवर केलेली असते कारण त्याना लागणारे भांडवलाचे प्रमाणच जास्त असते.

बेटा:
इंडेक्सच्या तुलनेत शेअरची किंमत किती अस्थीर आहे हे बेटा फँक्टरमुळे कळू शकते. जेवढा बेटा जास्त तेवढे शेअरच्या किंमतीत जास्त चढ-उतार संभवतात. तर जर बेटा उणे असेल तर समजावे कि तो बाजाराच्या कलाविरुध्द वाढ घट दाखवेल म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असेल तेव्हा अशा शेअरची किंमत मात्र कमी होते व बाजार खाली जात असताना याची किंमत वाढते. ह्याची गणना करणे हे फारच किचकट असल्यामुळे मी याचे सुत्र येथे देत नाही मात्र तो बीएसईच्या साईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतो,
http://www.bseindia.com/indices/betavalues.aspx या संकेतस्थळावर तुम्हाला कंपनीचा बेटा पाहाता येईल.

प्रतीशेअर उत्पन्न (Earning per share – EPS)
याच्यामुळे कंपनी प्रतीशेअर किती उत्पन्न मिळवते हे समजून येते आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मिळणारे प्रती शेअर उत्पन्न हेच जास्त महत्वाचे असते. इपीएस = कंपनीचा निव्वळ नफा / कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या या सुत्राने इपीएस काढला जातो. उदा. क्ष लि. चे २ कोटी शेअर्स आहेत व नफा जर रु.६ कोटी असेल तर इपीएस होईल रु.३ प्रती शेअर. याच्यामुळे कंपनी अल्पकाळात व दिर्घ काळात कशी ग्रोथ (वृध्दी) त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत करते हे समजून येते. म्हणून गुंतवणूक करण्यापुर्वी त्या सेक्टरमधील सर्व कंपन्याचा इपीएसची तुलना करणे अत्यावश्यक आहे.

पी / इ रेशो 
कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना फक्त इपीएस पाहून चालत नाही तर त्याच बरोबर त्याची तुलना शेअरच्या बाजारभावाशी करणेसुध्दा अत्यावश्यक असते. यासाठी पी ई रेशो पहाणे महत्वाचे असते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना पी / ई रेशो हा महत्वाचा घटक असल्यामुळे आपण याची येथे जरा विस्ताराने व उदाहरणासह चर्चा करुया. पी / ई रेशो = शेअरचे बाजार मुल्य (किंमत) / गेल्या ४ तिमाहितील इपीएस उदा. क्ष लि. च्या शेअरचे बाजारमुल्य आहे रु.१०० आणि त्याचा इपीएस आहे रु.२० प्रती शेअर तर त्या शेअरचा पी ई होतो ५. कंपनीच्या इपीएस मध्ये नियमीतपणे जर मोठ्या प्रमाणावर वाढ होत असेल त्या शेअरची किंमतही वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होते. जर का त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत एखाद्या कंपनीच्या शेअरचा पी ई रेशो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक महाग असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. तेच जर पी ई कमी असेल तर तो शेअर गुंतवणूकीसाठी योग्य आहे असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. मात्र मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या शेअरचा पी ई रेशो जास्त आहे अशा शेअरची कामगिरी जास्त चांगली झालेली दिसून आलेली आहे. क्ष ह्या कंपनीचे सध्याचे प्रती शेअर उत्पन्न रु.१ असून त्या कंपनीची अपेक्षा आहे कि हे उत्पन्न भविष्यात वार्षीक २०% दराने वाढेल हे गृहित धरल्यास ५ वर्षानंतर कंपनीचे प्रती शेअर उत्पन्न असेल रु.२.५०. आता असे धरुया कि या क्षेत्रानुसार कंपनीचा पी / ई रेशो १५ हा गुंतवणूकदाराचे दृष्टीने योन्य आहे. म्हणून हा शेअर अपेक्षीत २.५० च्या इपीएस नुसार १५ पटीने विकला जाईल (२.५० गुणीले १५) म्हणजेच रु.३७.५० या किंमतीला विकला जाईल तो होतो चालू वर्षाच्या इपीएसच्या ३७.५० पट. येथे कंपनी २०% वार्षीक दराने उत्पन्नात वाढ अपेक्षीत असल्यामुळे (व या कंपनीची मागिल कामगिरीही सतत चांगली राहिलेली असल्यामुळे) गुंतवणूकदार हा शेअर भविष्यात मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून जास्त किंमतीला तो शेअर खरेदी करण्यास तयार असतो. अशा वेळी तो शेअर उच्च पी / ई (या वर्षीच्या तुलनेत) असूनही खरेदी केला जातो. याचाच दुसरा अर्थ चांगल्या व्यवस्थानाखालील, चांगल्या कामगिरीचा इतिहास असलेल्या व भविष्यात आकर्षक उत्पन्न देऊ शकणा-या म्हणजेच थोडक्यात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चांगल्या (वेलनोन) कंपनीच्या शेअरला तो जास्त किंमत मोजण्यास तयार असतो.

रेशोंचे विश्लेषण आजकाल इंटरनेटवर अनेक साईटसवर उपलब्ध असते, प्रामुख्याने काही चांगल्या ब्रोकरच्या साईटवर, बीएसई व एनएसीच्या साईटवरही हे उपलब्ध असते या सुवीधेचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.

मात्र जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल व हे काम तुमच्यावतीने तज्ञ व्यक्तीने करुन तुम्हाला दिर्घ मुदतीत शेअर बाजारापासून मिळणार फायदा मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या वेग वेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणा-या म्हणजेच डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत नियमीत दर महा एसआयपीच्या माध्यमातून दिर्घ मुदतीसाठी (साधारण ५ वर्षापेक्षा जास्त व उत्तम परताव्यासाठी १५ ते २० वर्षे) करणे हे अतिशय फायदेशीर होते. अशाप्रकारच्या चांगल्या योजनानी सरासरी वार्षीक २५% चक्रवाढ दराने १५ पेक्षा अधीक वर्षाचे काळात उत्पन्न दिलेले आहे. आणि अजून किमान ३० ते ४० वर्षे ते याच दराने मिळण्याची शक्यता आहे.

रेशोंप्रमाणेचे कंपनीच्या फंडामेंटलचे विश्लेषण करणेही तेवढेच किंबहुना अधीक महत्वाचे आहे त्याबाबत आपण पुढील प्रकरणात चर्चा करुया.


Sunday, November 5, 2017

६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?

प्रकरण ६ वे
६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?
सर्वसामान्य माणूस शेअर बाजारातील तज्ञ होऊ शकतो काय?

होय, निश्र्चितच होऊ शकतो.
लोकांचा मात्र असा समज असतो कि सध्याच्या अस्थीर बाजारात काय आपला निभाव लागणे शक्य नाही. तसाच दुसरा असा समज आहे कि हे काम फक्त तज्ञ व्यक्तीच करु शकतात, माझे ते काम नव्हे, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हि गोष्ट खरीच आहे, अशावेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हेच तुमच्यासाठी योग्य होईल कारण तज्ञ फंड मँनेजर तुमच्यावतीने तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करत असतो, मात्र त्याच्यावर काही बंधने असतात, त्यातील महत्वाचे म्हणजे योजनेच्या उदिष्ठांनुसारच त्याला गुंतवणूक व्यवस्थापन करावे लागते, म्हणूनच म्युच्युअल फंडाची योजना निवडताना तिचे उदिष्ठ व मागील कामगीरी तपासून पहा. यासाठी चांगल्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घ्या.

मात्र जर तुम्ही स्वत: तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यास वेळ देऊ शकत असाल तर तुम्हीच तज्ञाप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. तुम्ही हे निश्र्चितच करु शकता. त्यासाठी ह्या लेखातील व या पुढे मी देत असलेले लेख काळजीपुर्वक वाचा व त्याचा उपयोग तुमच्या गुंतवणूक व्यवस्थापनासाठी करा. प्रथमत: तुम्ही ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करु इच्छित आहात त्याची माहिती नीट होण्यासाठी खालील बाबी कशा तपासाव्या हे मी तुम्हाला प्रथम सांगतो.

विक्रीतील वाढ
कंपनीची विक्रीत दर वर्षी होणारी वाढ हा एक महत्वाचा घटक आहे. मागील वर्षापेक्षा किती टक्के विक्री वाढली आहे हे तपासा. नियमीत वाढ हे कंपनीच्या चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. जर विक्रीत घट झाली असेल तर त्याचे कारण तपासा, हा बदल तात्पुरता आहे कि दिर्घकाळ परिणाम करणारा आहे याची माहीती घ्या. विक्रीत होणा-या वाढीचा दर हा प्रत्येक सेक्टरसाठी वेगवेगळा असू शकतो उदा. एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्याच्या विक्रीची वाढ हि १०% दराने साधारणपणे होत असल्यास चांगली समजली जाते तर आयटी कंपनीची वाढ हि २०% पेक्षा जास्त असणे चांगले समजले जाते. हा निकष प्रत्येक सेक्टरसाठी वेग-वेगळा असतो. विक्रीच्या वाढ/घटीचा परिणाम शेअर्सच्या किंमती कमी/जास्त होण्याशी असतो. अपवाद बाजारातील तात्तपुर्ती तेजी/मंदी. नेहमी विक्रीत वाढ होणारी कंपनी तुम्हाला दिर्घकाळात तुमच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा देऊ शकते. मात्र विक्रीतील वाढ एवढा एकच निकष पुरेसा नाही अन्य गोष्टी सुध्दा तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या आता एक एक करुन पाहुया.

बॉटम लाईन ग्रोथ
बॉटम लाईन ग्रोथ म्हणजेच कंपनीच्या निव्वळ (नेट) नफ्यात होणारी वाढ. निव्वळ नफ्यात नियमीतपणे होणारी वाढ कंपनीची प्रगती दाखवते व याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीत वाढ होण्यात होतो. नफ्यातील वाढ हिसुध्दा सेक्टरनुसार वेगवेगळी असते. उदा. आयटी सेक्टरमधील चांगल्या कंपनीच्या नफ्यातील वाढ हि गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ ते ७०% असू शकते तर एफएमसीजी व जुन्या कंपन्यांच्या बाबत हि वाढ १० ते १५% सुध्दा चांगली मानली जाते.

आरओआय रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट अर्थात गुंतवणूकीवरील परतावा:
म्हणजेच कंपनीने गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात किती परतावा मिळाला हे पहाणे. जर का एखाद्या कंपनीने रु.१०० कोटी मशिनरी, जमीन, मनुष्यबळ व अन्यत्र भांडवली गुंतवणूक केलेली असेल व जर त्या कंपनीला निव्वळ नफा रु.२५ कोटी वर्षात झालेला असेल तर आरओआय होईल २५%. परत आरओआय हा सुध्दा कंपनीच्या प्रकारावर पाहिला पाहिजे. आयटीसाठी तो ३५ ते ४० टक्के चांगला असेल तर भांडवली पीएसयुसाठी तो १० ते १५% चांगला समजला जातो.

व्हॉल्युम (उलाढाल):
काही तज्ञ कंपनीच्या शेअर्सच्या बाजारातील होणा-या रोजच्या रोजच्या व वर्षातील दररोजच्या सरासरी उलाढालीला महत्व देतात. यामुळे असे कळते कि त्या कंपनीच्या शेअर्सची रोज खरेदी विक्री किती संखेत होते. जर कंपनीच्या संबंधी एखादी महत्वाची बातमी बाजारात येते तेव्हा अचानकपणे त्या कंपनीच्या शेअर्सची उलाढाल वाढते कारण मागणी एकतर चांगली बातमी असली तर वाढते व वाईट बातमी असेल तर मागणी कमी होते व याचा परिणाम शेअरच्या किंमतीत होणा-या वाढ-घटीवर होतो. शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या संखेने हेही समजते कि त्या शेअरची तरलता किती आहे. ज्या शेअरची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असे शेअर विकणेही सुलभ असते (कारण गि-हाईक समोर असते) तसेच यांच्या खरेदीवर होणारा खर्चही अल्प असतो. याच्या उलट ज्या शेअर्सची कमी किंवा क्वचीतच उलाढाल होते अशा शेअर्सच्या किंमतीत होणारा बदलही मोठा असतो म्हणून अश्या शेअर्सच्या शक्यतो वाटेलाच जाऊ नये. उलाढालीमुळे शेअर्सच्या मागणी व पुरवठ्याचीसुध्दा कल्पना येते ज्यामुळे किंमत कमी होणार आहे कि वाढणार आहे याचा प्राथमीक अंदाज येतो. जेव्हा अचानकपणे एखाद्या शेअरची किंमत वाढू लागली कि त्याचे कारण तपासले पाहिजे, एक कारण असे असू शकते कि कोणतातरी संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअर्सची खरेदी करु लागला असेल. तसेच किंमत कमी होण्याचे कारण याच्या उलट असते, तेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असतात.

मार्केट कँपिटलाझेशन (भांडवली बाजार मुल्य)
कंपनीच्या सर्व मिळून शेअर्सचे होणारे त्या वेळचे बाजार मुल्य (एकूण शेअर्स गुणीले प्रती शेअरचा दर). यामुळे कंपनी मोठी, मध्यम कि लहान आहे हे कळते. तसेच त्या शेअरची तरलतासुध्दा यामुळे अजमावता येते, जेवढे भांडवली बाजार मुल्य जास्त तेवढी तरलता जास्त असण्याची शक्यता असते. आपल्याला जर नियमीत व स्थिर परतावे मिळावे असे वाटत असेल म्हणजेचे तुलनेत कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर ज्या कंपनीचे भांडवली बाजार मुल्य सर्वात जास्त आहे अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, जर मध्यम जोखीम घ्यावयाची असेल तर मध्यम आकाराच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व जर जास्तच जोखीम घ्याव्याची असेल तर लहान कंपन्याचे शेअर्स घ्यावेत. म्हणजेच भांडवली बाजारमुल्य आपणास शेअर खरेदी करताना आपली जोखीम ठरविण्यास मदत करते.

कंपनी व्यवस्थापन
खरे पहाता कंपनीचे व्यवस्थापन कोणत्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या हाती आहे हे पहाणे सर्वात महत्वाचे असते. यामुळे या व्यवस्थापनाच्या अन्य कंपन्या असल्यास त्यांची कामगिरी तुलनेसाठी फारच उपयुक्त ठरते. कंपनीचे व्यवहार किती पारदर्शक आहेत हे त्या कंपनीच्या व्यवस्थापनावरुनच समजते. त्यांची कंपनीकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे हेही फार महत्वाचे असते. म्हणूनच टाटा, बिर्ला, या समुहाला सर्वमान्यता जास्त असते. कंपनी कशी चालवावी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री. नारायण मुर्ती यानी चालवलेली इन्फोसीस हि कंपनी व व्यवस्थापन कसे नसावे याचे उदा. सत्यम कंपनी (आता ती महिंद्र गृपने घेतल्याने जुन्या भागधारकाना दिलासा मिळाला हि गोष्ट वेगळी). कंपनी कामगिरी कशी करणार हे पुर्णत: व्यवस्थापनावरच अवलंबून असते. जर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणा-या व्यक्ती या कार्यकुशल, प्रामाणिक व विश्वासार्ह असतील व ते जर अन्य चांगल्या कार्यरत असणा-या कंपनीच्या व्यवस्थापनेचा भाग असतील तर अशा कंपनीला मोठे गुंतवणूकदार नेहमीच प्राधान्य देत असतात. तसेच कंपनीचा एमडी कोण आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. यामुळेच आपण शेअर्स खरेदी करताना व्यवस्थापन कोणाचे आहे याला प्राधान्य दिले पाहिजे.

आता पुढील प्रकरणात आपण महत्वाचे रेशो कसे पहावेत याची माहिती घेऊ.